माझा स्वभाव तसा भित्रा नाही. पण मी कधी घाबरतच नाही असेही नाही.
पण एकदा मात्र मी जाम घाबरले होते. याचे कारण हे की मिट्ट काळोख होता.
तुम्ही म्हणाल काळोख होता तर काय त्यात घाबरायची काय गोष्ट ? तो तर
कायमच असतो !
मी पण आता असेच म्हणते पण ३ रीत असताना मी अंधाराला फार घाबरायचे,
१०-११ नंतरच्या काळोखाला तर फारच! त्यादिवशी पण तसंच झालं होतं.
मला खूपच भीती वाटली होती. ऐका तर मग !
११-१२ ची वेळ होती. आईने मला सुहृदसाठी पाणी आणायला स्वयंपाकघरात
पाठवलं. मी पेला घेऊन पाणी भरत असताना माझं लक्ष स्वयंपाकघराच्या खिडकीकडे गेलं.
बहुधा अमावस्या असावी कारण चंद्राचा प्रकाश मुळीच नव्हता. अचानक मला संध्याकाळी, ’मस्त आहे!’ म्हणून दोनदा वाचलेली शेरलॉक होम्स ची सोनेरी चष्म्याचे रहस्य गोष्ट आठवली.
एक बाई रात्रीच्या सुमारास विलबी नावाच्या एका तरुणाच्या पाठीत चाकू घालून त्याला मारते अशी काहीतरी गोष्ट होती. पण तिचा परिणाम असा झाला की मी खिडकीकडे पाठ केली व मला अचानक कोणीतरी त्या बाईसारखी खिडकीतून उडी मारल्याचा भास झाला. मी जाम घाबरले. पेला तसाच खालीच टाकून भीतीने थरथरत मी झोपायची खोली गाठून आईला मिठी मारली.
आता तो प्रसंग आठवला की मनमुराद हसते.
पण तेव्हापासून मी संध्याकाळच्या नंतर रहस्यकथा वाचत नाही.