Thursday, September 3, 2009

त्या दिवशी मी खूप घाबरले...


माझा स्वभाव तसा भित्रा नाही. पण मी कधी घाबरतच नाही असेही नाही.
पण एकदा मात्र मी जाम घाबरले होते. याचे कारण हे की मिट्ट काळोख होता.
तुम्ही म्हणाल काळोख होता तर काय त्यात घाबरायची काय गोष्ट ? तो तर
कायमच असतो !
मी पण आता असेच म्हणते पण ३ रीत असताना मी अंधाराला फार घाबरायचे,
१०-११ नंतरच्या काळोखाला तर फारच! त्यादिवशी पण तसंच झालं होतं.
मला खूपच भीती वाटली होती. ऐका तर मग !
११-१२ ची वेळ होती. आईने मला सुहृदसाठी पाणी आणायला स्वयंपाकघरात
पाठवलं. मी पेला घेऊन पाणी भरत असताना माझं लक्ष स्वयंपाकघराच्या खिडकीकडे गेलं.
बहुधा अमावस्या असावी कारण चंद्राचा प्रकाश मुळीच नव्हता. अचानक मला संध्याकाळी, ’मस्त आहे!’ म्हणून दोनदा वाचलेली शेरलॉक होम्स ची सोनेरी चष्म्याचे रहस्य गोष्ट आठवली.
एक बाई रात्रीच्या सुमारास विलबी नावाच्या एका तरुणाच्या पाठीत चाकू घालून त्याला मारते अशी काहीतरी गोष्ट होती. पण तिचा परिणाम असा झाला की मी खिडकीकडे पाठ केली व मला अचानक कोणीतरी त्या बाईसारखी खिडकीतून उडी मारल्याचा भास झाला. मी जाम घाबरले. पेला तसाच खालीच टाकून भीतीने थरथरत मी झोपायची खोली गाठून आईला मिठी मारली.


आता तो प्रसंग आठवला की मनमुराद हसते.
पण तेव्हापासून मी संध्याकाळच्या नंतर रहस्यकथा वाचत नाही.

Wednesday, September 2, 2009

चित्र

लाल रंगाची काढली शाल
पाहिली होती दुपारी काल
पिवळ्या रंगाचं परकर पोलकं
गळ्यात काढलं एक ढोलकं
हिरव्या रंगाची मुलगी छान जमली
अशा रंगाची मुलगी होती माझ्या मनावर बिंबली
काळ्या रंगाचे मग लांबसडक केस
ही तर होती अर्जंट केस
नंतर मुलगी इतकी छान दिसली
ती पाहून आई खुद्कन हसली
मी म्हणाले नाही का आवडला मुलीचा रंग?
तर आई म्हणाली छे बाई छान उधळले आहेस रंग!

अफजलखान

मी आणतो उचलला विडा
विजापूरहून निघाला सरदार बडा
खूप सैन्यानिशी आला चालून
त्याला वाटले शिवाजीला टाकले पाहिजे मारुन
खान होता सरदार वाईचा
त्याला माहित होता सर्व मुलुख वाईचा
महाराज तडक प्रतापगडावर गेले
खानाला वाटले महाराज घाबरले
खोटे सांगून महाराजांनी खानाला खेचून आणले
भेटीच्या दिवशी त्याला ठार केले
नंतर त्याचे प्रतापगडावर दफन करण्यात आले
स्वराज्याची प्रगती पाहून जिजाईला धन्य धन्य झाले