Saturday, October 8, 2011

मी - आम्ही

मी जन्मले तेव्हा मी म्हणजे फक्त ’मी’ होते. माझ्यावर ना कोणाचा प्रभाव होता ना जबरदस्ती, ही ’मी’ तेव्हा मनमानी करायची, रडायची, हट्ट करायची. मग ही ’मी’ मोठी झाली. ती ’आम्ही’ या गटात गेली. आम्ही - आमचं कुटूंब, आम्ही विद्यार्थी, आम्ही पुणेकर इ. या ’मी’ ला हे "आम्हीपण" आवडू लागलं. ती प्रत्येक ’आम्ही’ चा एक भाग झाली. मी ’आम्ही’ त मिसळून गेली. "मी" ला ’मी" साठी वेळ पुरेनासा झाला. तिचे सगळे "आम्ही’ म्हणजे मित्र-मैत्रिणी, वर्गमित्र, कुटूंब, यात ती गुंतून गेली. आज याच्यासाठी हे उद्या त्याच्यासाठी ते, असं चालू झालं. "मी" ’मी’ ला विसरूनच गेली. ’सगळ्या आम्ही’त मीच काहीतरी वेगळं केलं तर माझ्या प्रतिमेचं काय होईल? "मी" नं प्रतिमेला जपलं पण "मी"पण जपायला विसरली.
खूप दिवस गेले "मी" मोठी झाली, तिचा "आम्ही " परिवारही मोठा झाला, वाढला. आणि एकदिवस जेव्हा "मी" नं मागे वळून पाहिलं तेव्हा ती हळहळली. ’मी’ ने मान मिळवला पण स्वतःची आवडविसरली. नवी ’मी’, आधीची ’मी’ राहिलीच नाही. ’सगळ्यांचं असच होतं का?’ मी ला प्रश्न पडला. सगळ्या "आम्ही" त स्वतःच्या "मी" लाही वेळ द्यायला हवा हे तिला जाणवलं.
’मी’ असतो तेव्हा ’आम्ही’ असावसं वाटतं आणि जेव्हा ’आम्ही’ असतो तेव्हा काहितरी ’मी’चं असावसं वाटतं.
’मी’ मग मनाशी विचार करू लागली, आणि लहानपणीच्या ’मी’ शी तिची गट्टीच जमली. ’मी’ला ’मी’चच नवल वाटलं. काय जादू केली असावी या ’आम्ही’ने?
प्रत्येकजणच या ’मी’ आणि ’आम्ही’मधे गुंतत जातो. ज्यांना ’मी’ची आस वाटते आणि आम्ही ची शक्ती समजते, त्यांनाच तर म्हणतात......
" ’मी’पण त्यांना कळले हो........"

[ ना.शा.संगतीच्या तासाला लिहिलेला लेख. ]


- मुक्ता