माणसाचा मेंदू आणि हृदय यांच्यामधे एक पट्टा आहे,
तिथे चेता, मज्जा, स्नायूंसोबत भावनाही राहतात म्हणे!
त्यांपैकी आनंदाचा कोपरा असतो कायम उजळलेला
तिथे असतात निखळ, खळखळते हास्यरंग आणि सकारात्मक ऊर्जा
दुःख असतं पडून, डोळे मिटून कुठेतरी...
वेड्याला वाटतं की स्वतःला मिटून घेणं हाच सगळ्यावरती उपाय आहे!
पण मन गुंततं ते त्याच्यापाशीच आणि मोकळं होतं ते ही त्याच्यापाशीच...
खोलवर आत दडून बसलेली असते अव्यक्त, अस्पष्ट भिती
अज्ञाताच्या भयाने अज्ञातावरच विश्वास ठेवणारी आणि सतत नव्याने जन्मणारी
इथे राग हा मोठा दिलदार, काही साचत गेलं की लगेच बाहेर काढणारा
कधी उघड, धगधगता तर कधी छुपा, डूख धरून बसणारा
तशा अगदी गुण्यागोविंदाने राहतात या भावना,
पण कधी कधी मात्र काय होतं,
भितीला दाबून राग प्रकटतो, दुःख दाबून आनंद हसतो,
आनंदी व्हायचं सोडून मन भयकंपित होतं
आणि रागवून मोकळं होता येईल अशी गोष्ट दुःख कुरवाळत बसतं!
असं भावनांचं व्यक्त होणंच चुकलं की उरतं ते फक्त शून्य.
मग ना आनंद निर्मळ उरतो, ना दुःख खरच खुपतं,
उरते ती निराधार भावनांची, निर्विकार धडपड...
वा!छान!
ReplyDeleteखूपच छान! भावना पोहोचल्या!!!👏👏👏👏
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteसुंदर!!!☺☺
ReplyDeleteछान लिहीलस मुक्ता.
ReplyDelete