Thursday, March 10, 2011

पत्र

९ / ३ / ११, बुधवार
पान १
प्रिय आत्या, आजोबा, आजी,
सप्रेम नमस्कार! ( हे आपले उगाचच, दरवेळी काय विचारायचे कसे आहात? मला ठाऊक आहे तुम्ही कसे आहात!)पत्र लिहिणेस कारण की (पुढे सुचत नाही) आज कुठलेतरी रिकामे पाकीट सापडले आणि कितीतरी दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण झाली. खरे तर मी नीरजाला तिच्या सादरीकरणासाठी द्यायला कविता शोधत होते/ आहे. पण मधेच हे पाकिट दिसले आणि उचलले पेन लावले कागदाला! (उचलली जीभ लावली टाळयाला ) तुम्हांला एक विशेष ’ ता. क.’ सांगायचाय...... संस्थेची माहिती लिहायची होती, कविता लिहायची होती हे तुम्हांला ठाऊकच आहे. मी मयुरदादाच्या 'SPTM' ( save pune trafick (स्पेलिंग चूक) movment) बद्दल माहिती लिहिली होती. आधी ताईंची परवानगी घेऊन माझ्या ताज्या कविताही वाचायच्या ठरवल्या होत्या. शिवाय विंदांची ’घेता’ होतीच! मी सुरूवात केली आणि पहिली म्हणजे माझीच कविता वाचून संपवली, ती झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला! अशा बाबतीत चोखळदंड असणार्‍या वीणाताईंनीही कविता छान असल्याची पावती दिली., दुसरी कविता माझीच सुरू झाली, ती संपल्यावरही टाळ्या! मी चकीतच झाले! मग SPTM ची माहिती वाचायची होती (रमाने माहितीचे सुरूवातीचे वाक्य लिहिले होते, ’मी आज तुम्हांला फारश्या परीचित नसलेल्या संस्थेची माहिती सांगणार आहे!’ ) ती झाल्यावरही टाळ्या! (यावेळी टाळ्या का पडल्या ते मलाही ठाऊक नाही!) मग कोणीतरी ओरडले ” अरे, अजून एक कविता आहे” मग आमची घेता सुरू झाली. ती झाल्यावरही टाळ्या! या १० जणांमधे मला एकटीला एवढ्या टाळ्या मिळाल्या असतील! बर्‍याच जणांनी मला
पान २
सांगीतले की त्यांनी मला आधीच पूर्ण मार्क दिले होते! ( यावेळी विद्यार्थी मार्क देणार होते!)
आत्या, आलीच बघ १० तारीख, आता कितीसे दिवस उरलेत? ( गणित कच्चं) आज मोठीआई - आजोबा पनवेलला पोचलेत. ईशानची परीक्षा झाली सुद्धा! एकेकाचं नशीब असतं नाही का? (उत्तराची अपेक्षा नाही.) आमची उद्या चित्रकलेची परीक्षा आहे. आज आठवणीने खडू भरलेत. हल्ली गृहपाठाच्या बाबतीत माझ्या अंगात भयानक आळस भरलाय! उन्हाळा खुणावतोय दुसरं काय? आमचे वर्गमित्र-मैत्रिणी अभ्यासाला लागले सुद्धा! आमचं काय आदल्या दिवशी अभ्यास करूनही चांगलं चाललंय! मला आत्तापर्यंत बर्‍याच पेपरावर लिहून मिळालंय! ’अभ्यास केल्याचे जाणवते’ डोंबलाचा अभ्यास!
आता मला वाटतंय लवकरच मी दुसरा कागद घेणार. तशी माझी शैली ओघवतीच आहे, नाही का?
आईगं ss छे! डास चावला! उन्हाळ्यात डास कमी का होत नाहीत बरं?
माझे केस बर्‍यापैकी वाढलेत पण लोकांना मात्र तसं दिसत नाही. कारण ते खांद्यावर असल्याने खालून कुरूळे झाले आहेत. मी सारखे ते बोटे फिरवून सरळ करत राहते पण त्यामुळे ते आणखीनच कुरूळे होतात की काय अशी मला भीती वाटतीय! आजी, एखादा उपाय सुचवना? (तेल लावणे सोडून)
आमचे पेनबुवा आता लवकरच शाईची मागणी करणार असं दिसतंय, बहुदा पुन्हा उठावं लागेल, काय कटकट आहे!
पान ३
माझ्याकडे रिटा स्किटर सारखी लेखणी हवी होती, पटापट लिहिणारी! (स्वत:चं स्वत:)
खूपच उशीर होऊ लागलाय असं दिसतंय. आई, बाबा, लंपू एव्हाना झोपी गेले असतील. बाबूजींच्या मोबाईलवर ”गेले द्यायचे राहून ss'' ऎकू येतंय. ज्या कोणी गातायत त्यामुळे प्रसन्न वाटण्याऎवजी उदासवाणंच वाटतंय. जाउदे नाहीतर मला ’गेले द्यायचे राहून तुझ्यासाठी लिहिलेले पत्र.....” असं म्हणावं लागेल!
काल आम्ही मनीषाताईंचा ’सोलो’ पहायला गेलो होतो. काय सुंदर होता म्हणून सांगू! पण त्याआधी आयोजित केलेला सत्कारसमारंभ बाळबोधच होता/वाटला. पतंगराव कदम आले होते. ऍड. मकरंद ही होते (आडनाव विस्मृतीत, हे म्हणे दिल्लीतील मराठी विद्यार्थ्यांचे माहेरघर!) दाजीसाहेबही होते. त्यांनी मनीषाताईंना ५ हजार रू. चा चेक पाकीटात घालून दिला. ते पाकीट दिल्यावर म्हणाले ’आत पाच हजार रू. चा चेक आहे, तो उघडून दाखवू काय?’ या वाक्यानंतर जो हशा पिकला त्याचे वर्णन करणेच अशक्य आहे. सर्वांनी आपले मनोगत (भाषण) व्यक्त करायचे होते. एक किर्ती.... नावाच्या बाईंनी आपल्या संथ आवाजात सुरूवात केली आणि ’स्त्रिया कधीच दीन नव्हत्या’ या एका वाक्यावर टाळ्या/ हशा मिळवून गेल्या ( वाक्य तिसरे होते का ते आठवत नाही, कदाचित त्या पुणेकर नसतीलही) तेवढ्यात जानकीबाई (मृण्मयी देशपांडे) आल्या आणि मकरंद टिल्लू तेव्हढ्यात ७.०० वाजताच्या कुंकूंवर विनोद करून गेले. पतंगराव तर काय बोलत होते ते
पान ४
त्यांनाच ठाऊक! आधीच ते ’पतंगरावांचे मत राज्यसरकारला खूप महत्त्वाचे असते/ आकाशात भरारी घेणारा पतंग’ इ. टिल्लूंच्या स्तुतीमुळे हरभर्‍याच्या झाडावर जाऊन बसले होते! त्यांचे ’मनोगत’ उरकल्यावर ऍड. मकरंद उभे राहिले. त्यांनी अशा थाटात सुरूवात केली जणू ते ’शास्त्रा’ चे वकील म्हणूनच आले होते. असं शास्त्र सांगतं, तसं शास्त्र सांगतं असं ते सारखं- सारखं म्हणत होते. आता शास्त्र सर्वांच्या आधी त्यांना सांगतं आणि मग ते आपल्याला सांगतात की ते आपल्याला वाट्टेल ते ’शास्त्र’या नावाखाली सांगतात यापैकी सत्य काय देव जाणे!/ शास्त्र जाणे! अजून एक भारदार गृहस्थ तिथे उपस्थित होते. अगदी झब्बा गांधीटोपी घालून ते मनोगत सांगायला उभे राहिले तेव्हा बाबा म्हणाला,’आता बघ, श्लोक म्हणतील’ आणि खरोखरच त्यांनी ’समुद्र’ पासून सुरू होणारा श्लोक म्हणायला सुरूवात केली. शेवटी दीपश्च दीपश्च असं दहावेळा म्हणाले आणि मग स्वत:च्या कार्याबद्दल सांगू लागले! एकूणच माझ्यामते निवडसमितीला महिलांचा सत्कार करण्यासाठी कोणी मिळाले नसावे. मला त्यांना सल्ला द्यायला आवडेल!
आजची मॅच छान झाली ना? तशी यशाबद्दल खात्री होती, तरीही!
अच्छा! आता झोप येतीये, पत्र मिळाल्यावर लगेच फोन करा.
-- तुमची लाडकी
एकुलती एक नात, एकुलती एक भाची,
मुक्ता!

6 comments:

  1. मुक्ता,
    काय प्रतिक्रिया देऊ तेच कळत नाही इतकं सुंदर लिहिलं आहेस.

    रात्री घरातले सगळे झोपल्यावर असलं एकटीनंच काहीतरी करत बसायला भारी वाटतं ना?!

    ReplyDelete
  2. कुंकुतल्या जानकीच्या भाषेत " लय भारी!" कंस तर फारच भारी.

    ReplyDelete
  3. मुक्ता,
    राव्लिंगबाईंहून भन्नाट मेंदू असताना रिटा स्किटरसारखी जादूची लेखणी/कळीफलक निर्माण करणे तुला अवघड नाही काही! चेष्टा नाही करत मी. बघ ना - तू मराठीत पण मस्त लिहू शकतेस आणि इंग्रजीत पण! राव्लिंगबाईंना मराठीत लिहायला सांग पाहू - बघ, कशी भंभेरी उडेल ती!

    - सचिन

    ReplyDelete
  4. जबरदस्त!-तुझा(एकुलता एक कसे म्हणू?)भाऊ

    ReplyDelete